Tuesday, February 24, 2009

अंतराळातील भस्मासूर

लोकसत्ता, प्रदीप नायक, २२-०२-२००९.

मंगळवार, १० फेब्रुवारी २००९. जमिनीपासून ७७६ किलोमीटर उंचीवरील अवकाशात पृथ्वीभोवती आपापल्या कक्षेत फिरणाऱ्या दोन कृत्रिम उपग्रहांची टक्कर झाली! अखिल अवकाश विज्ञान जगताला हादरवून टाकणारी ही घटना! पृथ्वीवरील रस्त्यांवर वाहनांची संख्या खूप वाढल्यामुळे होणाऱ्या वाहनांच्या अपघाताची आपल्याला आता सवय झाली आहे. पण अवकाशात झालेल्या या अभूतपूर्व अपघातानं शास्त्रज्ञांची झोप उडवून टाकली आहे. पृथ्वीभोवती अनेक अत्यंत महत्त्वाचे उपग्रह, हबल अवकाश दुर्बिणीसारखी वेधशाळा आणि ज्यात अंतराळवीरांचं सतत वास्तव्य असतं असं आत्यंतिक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक यांना या टकरीमुळे धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

५२ वर्षांपूर्वी, ४ ऑक्टोबर १९५७ रोजी तेव्हाच्या सोव्हिएत रशियानं ‘स्पुटनिक-१’ हा पहिलावहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडला. पृथ्वीभोवती घिरटय़ा घालणाऱ्या या लहानशा रशियन उपग्रहाने अमेरिकेला अस्वस्थ करून टाकलं होतं. स्पुटनिकच्या उड्डाणानं अवकाश युगाला सुरुवात झाली. रशिया व अमेरिका यांच्यामधील अवकाश स्पर्धेमुळे उपग्रहांच्या विकासाला खूपच गती

मिळाली. जास्तीत जास्त संख्येने उपग्रह पाठविण्यासाठी या दोन देशांमध्ये चढाओढ सुरू झाली. अमेरिकेनं त्यांचा पहिला उपग्रह ‘एक्स्प्लोरर-१’ ३१ जानेवारी १९५८ रोजी सोडला. तेव्हापासून आजतागायत जगातील ४० पेक्षा जास्त देशांनी १५ हजारांपेक्षा जास्त कृत्रिम उपग्रह तयार करून स्वत: किंवा इतर देशांच्या रॉकेट्सच्या सहाय्यानं पृथ्वीभोवती विविध कक्षेत पाठवले आहेत. यातले सुमारे २,५०० उपग्रह अजूनही पृथ्वीभोवती फिरत आहेत.

कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवतीच्या कक्षेत पाठवायचा असेल, तर त्याचं कार्य काय असेल, हे आधी ठरवावं लागतं. त्याप्रमाणं मग त्याची कक्षा ठरवावी लागते. जमिनीपासून उंचीनुसार तीन प्रकारच्या कक्षा ठरवण्यात आल्या आहेत. १० कि.मी.पासून २ हजार कि.मी.पर्यंतच्या कक्षांना ‘निम्म भू-कक्षा’ (लो-अर्थ ऑर्बिट) असं म्हणतात. २००० कि.मी.पासून ३५,७८६ कि.मी.पर्यंतच्या कक्षांना ‘मध्यम भू-कक्षा’ (मीडियम अर्थ ऑर्बिट) असं म्हणतात व ३५,७८६ कि.मी.च्या वरील कक्षांना ‘उच्च भू-कक्षा’ (हाय अर्थ ऑर्बिट) म्हणतात.

३५,७८६ कि.मी.च्या वरील कक्षेतले उपग्रह ज्या वेगानं पृथ्वी स्वत:भोवती फिरते, त्याच वेगानं पृथ्वीभोवती फिरत असतात. यामुळे पृथ्वीवरून पाहिलं असता हे उपग्रह स्थिर भासतात. अशा उपग्रहांना ‘भू-स्थिर’ उपग्रह असंही म्हणतात. सर्वसाधारणपणे या उंचीवर दळणवळण क्षेत्रातले व हवामान उपग्रह भू-स्थिर केलेले असतात. भारतानं पाठवलेले ‘इन्सॅट’ सीरिजचे सर्व उपग्रह याच भू-स्थिर कक्षेतले आहेत. या उंचीवरून पृथ्वीवरील जवळजवळ अर्धा भूभाग नजरेस पडत असतो. त्यामुळे इतर देशांतील टेलिव्हिजन सिग्नल्स, दूरध्वनी संदेश वहन यांची देवाणघेवाण सोपी जाते. हवामानाचा अंदाज बांधण्यासाठी या उंचीवरील उपग्रहांचा फायदा होतो. हवामानातील सातत्यानं होणारे बदल, ढगांचं आवरण, वाऱ्याचा वेग यासारखी माहिती हे उपग्रह अविरतपणे पृथ्वीवर पाठवत असतात.

२००० कि.मी. ते ३५,७८६ कि.मी. मधल्या कक्षेत फिरणारे ‘मीडियम अर्थ ऑर्बिट’मधले उपग्रह रेडिओ संदेशांचं वहन करण्यासाठी प्रामुख्यानं वापरले जातात. विमानं, जहाजं तसंच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) यांच्यामधील रेडिओ संदेश वहन या उपग्रहांमुळे शक्य होतं.

१० कि.मी.पासून २००० कि.मी. उंचीपर्यंतचे ‘लो-अर्थ ऑर्बिट’मधले उपग्रह संख्येने सर्वात अधिक आहेत. या उंचीवर नकाशे, खनिजांचं मापन, लोकसंख्या, जंगल, शेती यांचं मापन व नियोजन करणारे अशा अनेक प्रकारच्या उपग्रहांची दाटी आहे. विज्ञानासाठी वापरले जाणारे सर्व उपग्रहही याच कक्षेमध्ये फिरत असतात. हबल अवकाश दुर्बीण, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक, भारताचे इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट (आयआरएस) सीरिजमध्ये असलेले उपग्रह यांसारखे शेकडो उपग्रह लो-अर्थ ऑर्बिटमध्ये फिरत आहेत. या कक्षांमधील अनेक उपग्रह ध्रुवीय कक्षेत म्हणजे पृथ्वीच्या उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव अशा कक्षेत फिरत असतात. हे उपग्रह सतत सूर्याकडे ‘तोंड’ करून असतात, जेणेकरून त्यांना सौरऊर्जा वापरता येईल. उपग्रहाला जोडलेल्या सौरपट्टय़ांचा सौरऊर्जेसाठी वापर करून उपग्रहातील उपकरणांना वीज पुरवतात.

उपग्रह अवकाशात पाठवायचा म्हटलं, तर त्यासाठी एखादं वाहन हवं. उपग्रह पृथ्वीभोवती विशिष्ट उंचीवर फिरता ठेवण्यासाठी पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती व उपग्रहाचा पृथ्वीभोवती फिरण्याचा वेग यांचा योग्य समतोल साधायला हवा. उपग्रहाला विशिष्ट उंचीवर नेण्यासाठी व ठराविक वेग देण्यासाठी अग्निबाणाचा वापर करावा लागतो. अग्निबाणांचा पहिला उपयोग दुसऱ्या महायुद्धात शत्रुराष्ट्रांवर हल्ला करण्यासाठी केला होता. रॉबर्ट गोडार्ड या अमेरिकन संशोधकाने विकसित केलेल्या अग्निबाणांच्या साहाय्याने अमेरिकन उपग्रह सोडण्याची संकल्पना विकसित केली जात होती. ‘केलेल्या प्रत्येक क्रियेला विरुद्ध आणि समान प्रतिक्रिया निर्माण होते’, या न्यूटनच्या तिसऱ्या नियमाचा वापर करून अग्निबाण अवकाशात पाठवला जातो. अग्निबाणात असलेल्या घनरूप अथवा द्रवरूप इंधनाचं ज्वलन सुरू झालं, की त्यापासून निर्माण होणारे वायू अग्निबाणाच्या खालच्या बाजूस असलेल्या लहान आकाराच्या नळीतून (नोझलमधून) प्रचंड वेगाने बाहेर पडतात. त्याची प्रतिक्रिया म्हणून अग्निबाण अवकाशात ढकलला जातो. ज्याप्रमाणे पाण्यात पोहताना हात मारून पाणी मागे ढकललं, की आपण पुढे सरकतो त्याप्रमाणे रॉकेट अवकाशात झेपावतो. अग्निबाणाचे सर्वसाधारणपणे तीन टप्पे असतात. उड्डाणानंतर क्रमाक्रमाने दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील इंधनाचं ज्वलन केलं जातं. तिसऱ्या टप्प्यानंतर उपग्रह अग्निबाणापासून अलग केला जातो व विशिष्ट कक्षेत ढकलला जातो. या क्षणाला उपग्रहाला विशिष्ट वेगही मिळालेला असतो. हा वेग साधारणपणे ताशी २५ हजार किलोमीटर इतका असतो. अर्थात उपग्रहांचा वेग त्यांच्या कक्षेच्या उंचीवर अवलंबून असतो.

आपल्यासाठी अग्निबाणांचा संदर्भ यासाठी महत्त्वाचा आहे, की दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील अग्निबाणांचे अवशेष जेव्हा उपग्रहापासून वेगळे होतात, त्या वेळी हे अवशेष अंतराळातच फिरत राहतात. अनेक वेळा उपग्रहांवरही लहान लहान बूस्टर रॉकेट्सही बसवलेली असतात. या रॉकेट्सचे अवशेषही अवकाशातच भरकटत असतात. अगदी लहान, एक सें.मी. लांबीच्या तुकडय़ांपासून ४ ते ५ मी. लांबीचे मोठमोठे तुकडे अशा अवशेषांच्या स्वरूपात १० कि.मी.पासून २००० कि.मी.पर्यंतच्या कक्षांमध्ये प्रचंड वेगाने फिरत आहेत. एका अंदाजानुसार सध्या असे जवळजवळ सात लाख लहानमोठे तुकडे कचऱ्याच्या स्वरूपात अवकाशात आहेत. यातील काही तुकडे कालांतराने पृथ्वीच्या वातावरणात शिरून घर्षणाने जळून भस्मसात होतात. क्वचितच एखादा मोठा तुकडा जळत येऊन पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळू शकतो. अर्थात पृथ्वीचा ७० टक्के पृष्ठभाग महासागरांनी व्यापलेला असल्यामुळे असा तुकडा पाण्यात पडण्याची शक्यता जास्त असते.

प्रत्येक उपग्रहाला एका ठराविक काळापर्यंत कार्य करता येतं. बहुतेक उपग्रहांचं आयुष्य पाच ते सात र्वष असतं. त्यानंतर त्यातली बॅटरी संपुष्टात आल्यामुळे अथवा त्याच्या बूस्टर रॉकेट्समधलं इंधन संपल्यामुळे तो उपग्रह निकामी होतो. अनेक वेळा उपग्रहातील उपकरणं किंवा संगणक काम करेनासा झाल्यामुळेही तो उपग्रह कुचकामी ठरतो. अशा अनेक कारणांमुळे निकामी झालेल्या उपग्रहांना गोळा करून पृथ्वीवर आणणं, ही जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट आहे. अर्थात, स्पेस शटलच्या युगातही असे उपग्रह परत आणणं हे अत्यंत खर्चिक आहे. त्यामुळे हे उपग्रह तसेच अवकाशात फिरत ठेवले जातात.

अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी पाठवलेले उपग्रह विविध आकारमानाचे व वस्तुमानाचे असतात. उपग्रहांचं सरासरी वस्तुमान ५०० ते १ हजार कि.ग्रॅ. इतकं असतं. या वस्तुमानाच्या उपग्रहांनी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला, तर घर्षणाने निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे पृष्ठभागापर्यंत यायच्या आतच ते जळून पूर्णपणे नष्ट होतात. अगदी ५०० ते ६०० कि.मी. उंचीवरही अत्यंत विरळ वातावरणाचा उपग्रहांवर त्यांच्या आकारमानानुसार ‘ड्रॅग’ येतो. त्यामुळे त्यांची कक्षा हळूहळू ढळत जाते. कालांतराने ते दाट वातावरणात प्रवेश करतात व नष्ट होतात. पाच टनांपेक्षा जास्त वस्तुमानाचा एखादा महाकाय उपग्रह किंवा अवकाश वेधशाळा अशा प्रकारे वातावरणात प्रवेश करू शकते. हे राक्षसी उपग्रह घर्षणाने पूर्णपणे जळून नष्ट होऊ शकत नाहीत व त्यांचे अवशेष पृष्ठभागापर्यंत येऊन आघात करू शकतात. अशा आघातामुळे मोठी जीवितहानी होऊ शकते. अशा प्रकारे १९७९ मध्ये अमेरिकेच्या ‘स्कायलॅब’ या वेधशाळेचे काही अवशेष जमिनीवर येऊन आदळले होते. अगदी अलीकडे अमेरिकेचा हेरगिरी करणारा १० टन वजनाचा उपग्रह निकामी झाल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर अशा उपग्रहांमधील बूस्टर रॉकेट्समध्ये इंधन शिल्लक असेल आणि या उपग्रहांवर शास्त्रज्ञांचं नियंत्रण असेल, तर उपग्रहाला ठराविक कक्षेत ढकलून तो महासागरातच आदळेल, अशी शक्यता निर्माण करतात. दाट लोकवस्तीच्या भागात असा एखादा उपग्रह कोसळण्याची एक टांगती तलवार सतत मानवाच्या डोक्यावर आहे.

परंतु, हे झालं अवकाशातून पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन आदळणाऱ्या उपग्रहांबद्दल आणि अग्निबाणांच्या अवशेषांबद्दल. पण अवकाशात पृथ्वीभोवती निर्माण झालेल्या या कचऱ्यामुळे अंतराळातील उपग्रहांना धोका संभवतो का? गेली अनेक र्वष शास्त्रज्ञ अशा धोक्याची सूचना देत होते. ‘लो-अर्थ ऑर्बिट’मध्ये झालेली उपग्रहांची दाटी आणि विशेष म्हणजे अग्निबाणांचे अक्षरश: लक्षावधी लहान-मोठे तुकडे यांमुळे अशा अपघाताची शक्यता खूप वाढली आहे. अवकाशात आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी अनेक देश धडपड करत आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांत भारतानेही अनेक उपग्रह अवकाशात पाठवले. अगदी अलीकडे पाकिस्तान व इराण यांनीही आपापले उपग्रह अवकाशात पाठवण्याची घोषणा केली आहे. सध्या ४० पेक्षा जास्त देशांचे उपग्रह अवकाशात भ्रमंती करत आहेत. प्रत्येक वेळी उपग्रह अवकाशात पाठवला, की त्यामुळे अनेक प्रकारचा कचरा निर्माण होतो व तो अवकाशातच राहतो.अवकाशात सातत्याने भर पडत असलेल्या कचऱ्यामुळे मानवासमोर गंभीर समस्या उभी राहिली आहे. सध्या कार्यरत असलेले अनेक उपग्रह या कचऱ्याच्या आघातामुळे निकामी होऊ शकतात. सर्वात मोठा धोका कायम मानवी वास्तव्य असलेल्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला आहे.

अगदी लहानसा तुकडाही उपग्रहाचं मोठं नुकसान करू शकतो. कारण अवकाशात फिरत असलेल्या सर्व तुकडय़ांना ताशी सुमारे २५ हजार कि.मी.चा वेग प्राप्त झालेला असतो. ज्याप्रमाणे वेगाने जाणाऱ्या विमानावर झालेला लहानशा चिमणीचा आघातही धोकादायक ठरू शकतो, त्याप्रमाणेच वेगाने आदळलेला तुकडा अवकाश स्थानकाला छिद्रदेखील पाडू शकतो. अशा लहानशा आघातामुळेही उपग्रहावरील उपकरणे निकामी होऊ शकतात. एक उपग्रह अंतराळात पाठवण्यासाठी झालेला कोटय़वधी रुपयांचा खर्च लक्षात घेता अशा अपघातांमुळे होणारं राष्ट्रीय संपत्तीचं नुकसानही लक्षात घेण्यासारखं आहे. उपग्रहांचा असा अपघात होण्याची शक्यता कमी असल्याने शास्त्रज्ञांनी धोक्याच्या सूचना देऊनही हे फारसं गांभीर्यानं घेतलं गेलं नाही. यामागचं महत्त्वाचं कारण असं, की अवकाशातील सर्व उपग्रह व अग्निबाणाचे अवशेषदेखील एकाच दिशेने- पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. पृथ्वीच्या गतीचा फायदा मिळवण्यासाठी सर्वच अग्निबाण या दिशेने पाठवले जातात. जसं एखाद्या महामार्गावरून एकाच दिशेने वेगाने जाणाऱ्या वाहनांचा अपघात होण्याची शक्यता कमी असते, त्याप्रमाणेच उपग्रहांचाही अपघात व्हायची शक्यता तुलनेने कमी आहे. उपग्रहांच्या बाबतीत एक महत्त्वाचा फरक असा, की रस्त्यांवर गाडय़ा आपापल्या ‘लेन्स’मधून एकमेकांना समांतर प्रवास करत असतात, तर अनेक उपग्रह व अवशेष विषुववृत्ताला वेगवेगळ्या कोनात फिरत असतात. त्यामुळे त्यांच्या अपघाताची शक्यताही वाढते.

उपग्रहांच्या इतिहासात नोंदला गेलेला उपग्रह व अग्निबाणाच्या अवशेषाचा पहिला अपघात १९९६ मध्ये झाला. १९९५ मध्ये पाठवण्यात आलेल्या ‘सेरिज’ या फ्रेंच उपग्रहाची जुलै १९९६ मध्ये अग्निबाणाच्या एका अवशेषाशी टक्कर झाली. त्यामुळे सेरिज उपग्रहाचा एक भाग निकामी झाला व तो भरकटू लागला. सुदैवाने हे ताबडतोब लक्षात आल्यामुळे शास्त्रज्ञांना पुन्हा त्या उपग्रहावर नियंत्रण मिळवणं शक्य झालं. त्यानंतर झालेल्या अनेक लहान- लहान टकरींची नोंद आहे. पण रस्त्यावरून जाणाऱ्या गाडीवर एखादा लहान दगड आदळणं आणि दोन गाडय़ांची टक्कर होणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.

मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेचा दळणवळण उपग्रह ‘इरीडीअम- ३३’ हा ५६० कि.ग्रॅ. वस्तुमानाचा उपग्रह त्याच्या ध्रुवीय कक्षेत फिरत होता. उड्डाणानंतर १२ वर्षांनी अजूनही कार्यरत असलेला हा उपग्रह ताशी २६ हजार किलोमीटर वेगाने पृथ्वीभोवती फिरत होता. त्याच वेळी १९९३ मध्ये अवकाशात पाठवलेला रशियाचा ९५० किलोग्रॅम वजनाचा ‘कॉसमॉस २२५१’ हा उपग्रह ताशी सुमारे २२ हजार कि.मी. वेगाने विषुववृत्ताला ५२ अंशाचा कोन करून फिरत होता. १९९५ पासून पूर्णपणे निकामी झालेल्या कॉसमॉस उपग्रहावर शास्त्रज्ञांचे काहीच नियंत्रण नव्हते. हे उपग्रह एकमेकांपासून काही अंतरांवरून निघून जातील असा शास्त्रज्ञांचा अंदाज होता. परंतु ७७६ कि.मी. उंचीवरून फिरणाऱ्या या उपग्रहांची भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १० वाजून ३० मिनिटांनी टक्कर झाली आणि अवघे विज्ञानजगत हादरले! दोन उपग्रहांची अशी पहिल्यांदाच टक्कर होत होती. या टकरीच्या वेळी दोन्ही उपग्रहांचा एकत्रित वेग ताशी ४८ हजार कि.मी. इतका प्रचंड होता. टकरीमुळे दोनही उपग्रहांच्या ठिकऱ्या उडाल्या. सध्या या तुकडय़ांचे दोन मोठे पुंजके अवकाशात फिरत आहेत. याचा सर्वात मोठा धोका आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला निर्माण झाला आहे. या स्थानकात तीन अंतराळवीर असून त्यांच्या जीविताला कोणताही धोका पोहोचू नये, याची शास्त्रज्ञ काळजी घेत आहेत. सध्या ताबडतोब अवकाश स्थानकाला धोका नाही, कारण हा अपघात झाला ७७६ कि.मी. उंचीवर तर अवकाश स्थानक फिरत आहे ४३० कि.मी. उंचीवर. इरिडीअम-कॉसमॉसच्या टकरीमुळे विविध आंतरराष्ट्रीय संस्था खडबडून जाग्या झाल्या आहेत. कोणी किती उपग्रह सोडायचे व कोणत्या कक्षेत ठेवायचे, यावर आजपर्यंत कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थेचे नियंत्रण नाही. अवकाशात केलेला कचरा साफ कसा करायचा? मुख्य म्हणजे कोणी करायचा, याविषयीही काहीच स्पष्टता नाही. अशा अपघातामुळे झालेलं नुकसान कसं भरून काढायचं? आणि कोणाकडून? अशा घटनेला कोणाला जबाबदार धरायचं? असे अनेक प्रश्न आता गांभीर्याने चर्चेला घेण्याची वेळ आली आहे.

जगभर अनेक देशांची ‘सॅटेलाइट ट्रॅकिंग स्टेशन्स’ आहेत. त्यामार्फत सर्व उपग्रहांचा सतत मागोवा ठेवला जातो. अमेरिकेच्या वायुदलाचं ‘स्पेस सव्‍‌र्हेलन्स नेटवर्क’ अंतराळातील उपग्रहच नव्हेत, तर सर्व लहान-मोठय़ा अवशेषांचाही सतत मागोवा ठेवत असतं. १९५७ पासून कार्यरत असलेल्या ‘स्पेस सव्‍‌र्हेलन्स नेटवर्क’तर्फे १० सें.मी.पेक्षा मोठय़ा आकाराच्या अवशेषांचा वेध घेतला जातो. अशा २७ हजारपेक्षा जास्त वस्तूंची या संस्थेतर्फे माहिती गोळी करण्यात आली आहे. ही माहिती सर्वासाठी उपलब्ध असते. कोणता उपग्रह कोणत्या मार्गाने अवकाशातून कोणत्या वेळेला जाणार आहे, ही माहितीही इंटरनेटवर उपलब्ध असते. ज्या उपग्रहांच्या व अवशेषांच्या कक्षा एकमेकांना छेदतात व त्यांच्या आघातांची शक्यता असते त्यांची माहितीही प्रसृत करण्यात येते. इरिडीअम व कॉसमॉस हे उपग्रह एकमेकांपासून ५८४ मीटर अंतरावरून जातील, असं भाकीत असल्यामुळे सर्वजण निर्धास्त होते. उपग्रहांच्या कक्षा सूर्याच्या प्रारणामुळे किंवा पृथ्वी-चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे किंचितशा बदलू शकतात. या बदलामुळेच १० फेब्रुवारीचा अपघात कल्पना नसताना झाला. अन्यथा इरिडीअमचा मार्ग थोडासा बदलणं आणि हा अपघात टाळणं शास्त्रज्ञांना शक्य झालं असतं.

असा अपघात पुन्हा होऊ नये व अवकाशातील कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली जावी, यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या ‘कमिटी ऑन पीसफुल युझेस ऑफ आऊटर स्पेस’ या समितीचा विचारविमर्श सुरू झाला आहे. ‘सेक्युअर वर्ल्ड फाऊंडेशन’ या संस्थेनंही जगातील सर्व देशांमध्ये व आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये समन्वय असावा व अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी आता तरी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.

५२ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या अवकाशयुगामुळे मानवजातीचा प्रचंड वेगाने विकास झाला. जग खऱ्या अर्थानं ‘ग्लोबल व्हिलेज’ झालं. पण या विकासाबरोबर निर्माण झालेली अवकाश कचऱ्याच्या प्रदूषणाची समस्या योग्य वेळीच हाताळली गेली पाहिजे. ज्याप्रमाणे पृथ्वीवर ध्वनी, जल व वायू प्रदूषणाचा भस्मासुर आपल्याला सतावत आहे त्याप्रमाणेच अंतराळातील हा भस्मासुरही आपल्याला ग्रासून टाकण्याआधीच त्याला काबूत आणलं पाहिजे.

इरिडीअम प्रकल्प
‘इरिडीअम ३३’ हा अपघात झालेला उपग्रह ६६ उपग्रहांच्या समूहापैकी एक आहे. ‘इरिडीअम सॅटेलाईट’ या कंपनीने अवकाशात पाठविलेले हे ६६ उपग्रह पृथ्वीभोवती उपग्रहांचं एक जाळंच निर्माण करतात. १९९८ पासून कार्यरत असलेली ही उपग्रह प्रणाली जगभर सॅटेलाईट फोन सेवा पुरवते. संपूर्ण पृथ्वीवर कोठेही इरीडीअम फोन सेवा पुरविली जाते. उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत असा एकही भाग नाही की जेथे इरीडीअम फोन सेवा मिळत नाही. सहा अब्ज डॉलरच्या या प्रकल्पामध्ये ७७ उपग्रह असतील, अशी सुरवातीची योजना होती. इरीडीअम हे एक मूलद्रव्य आहे. त्याचा अणूक्रमांक ७७ आहे. इरिडीअम अणूच्या केंद्राभोवती ज्याप्रमाणे ७७ इलेक्ट्रॉन फिरत असतात, त्याप्रमाणे पृथ्वीभोवती ७७ इरिडीअम उपग्रह फिरतील, अशी कल्पना प्रकल्पाच्या आयोजकांनी केली होती. पुढे प्रकल्पाची किंमत प्रमाणापेक्षा जास्त वाढू लागल्याने उपग्रहांची संख्या ६६ वर मर्यादित ठेवण्यात आली. यातला इरिडिअम ३३ हा उपग्रह अपघातात नष्ट झाल्याने आता इरीडिअम उपग्रहांची संख्या ६५ वर
आली आहे.

अवकाशात उपग्रह प्रक्षेपित करणारे देश : रशिया, अमेरिका, चीन, जपान, भारत, इस्राएल, युक्रेन, इराण व युरोपियन युनियन.
स्पुटनिकपासून आजपर्यंत पाठविल्या गेलेल्या उपग्रहांची एकूण संख्या :
६००० च्या वर.
उपग्रहांच्या कक्षा :
१) लो-अर्थ ऑर्बिट (१ कि.मी. ते २०० कि.मी)
२) मीडिअम अर्थ ऑर्बिट (२०० कि.मी. ते ३५७८६ कि.मी.)
३) हाय अर्थ ऑर्बिट (३५७८६ कि.मी.च्या वर)
सर्वात जास्त उपग्रह असलेली कक्षा : लो-अर्थ ऑर्बिट
लो-अर्थ ऑर्बिटमधली उपग्रहांची संख्या : २४५६
लो-अर्थ ऑर्बिटमधल्या १० से.मी. पेक्षा मोठय़ा अवशेषांची संख्या :
सुमारे ७ लाख.
लो-अर्थ ऑर्बिटमधल्या एक से.मी. पेक्षा मोठय़ा अवशेषांची संख्या :
सुमारे ६ लाख.

उपग्रहांची टक्कर
टक्करीचा दिवस : १० फेब्रुवारी २००९
वेळ : वैश्विक वेळ १७.००(भारतीय प्रमाणवेळ १०.३०)
टक्करीतला पहिला उपग्रह : इरीडीअम-३३, दळणवळण उपग्रह, अमेरिका.
वस्तुमान : ५६० कि.ग्रॅ., कक्षा-ध्रुवीय
वेग : ताशी २६ हजार कि.मी
टक्करीतला दुसरा उपग्रह : कॉसमॉस-२२५१, मृत उपग्रह, रशिया.
वस्तुमान : ९५० कि.ग्रॅ.,कक्षा- विषुववृत्तीय.
वेग : ताशी २२ हजार कि.मी.
टक्करीचे स्थळ : जमिनीपासून ७७६ कि.मी. उंचीवर