Friday, June 22, 2007

शक्तिशाली अणुबॉंबसाठी पाकमध्ये नवी अणुभट्टी

आणखी शक्तिशाली अणुबॉंब तयार करण्यासाठी पाकिस्तान कुशाब येथे नवी अणुभट्टी बांधत असल्याचे "इन्स्टिट्यूट फॉर सायन्स अँड इंटरनॅशनल सिक्‍युरिटी' (आयएसआयएस) या संस्थेने नमूद केले आहे. या भट्टीत प्लुटोनियमचे उत्पादन होणार आहे.

उपग्रहाद्वारे मिळालेल्या छायाचित्रांवरून पाकिस्तान अशी अणुभट्टी बांधत असल्याचे दिसत असल्याचे संस्थेने म्हटले आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात अमेरिकेबरोबरच्या संबंधात तणाव आलेला असताना पाकिस्तानने हा भट्टी बांधण्याचा उद्योग सुरू केला आहे. ""नवे, हलके आणि शक्तिशाली अणुबॉंब तयार करण्यासाठी या भट्टीचा उपयोग केला जाईल,'' असा अंदाज "आयएसआयएस'चे अध्यक्ष डेव्हिड अल्ब्राइट व संशोधक पॉल ब्रॅनेन यांनी व्यक्त केला आहे.

ही संस्था वॉशिंग्टनमधील आहे. कुशाबला अणुभट्टी बांधली जात असतानाच तेथून पन्नास मैलांवरील चष्मा येथे प्लुटोनियम वेगळे करण्याची सुविधा निर्माण केली जात असल्यामुळे लवकरच उपखंडात भारत-पाकिस्तान अण्वस्त्रस्पर्धा सुरू होईल, असे मत या दोघांनी व्यक्त केले. हलक्‍या व आधुनिक अण्वस्त्रांच्या निर्मितीसाठी प्लुटोनियमचा वापर केला जात असल्याने या संस्थेच्या अहवालास महत्त्व प्राप्त झाले आहे. कुशाबच्या अणुभट्टीचे काम 2000 पासून सुरू आहे. तेथे तीन बांधकामे केली जाणार आहेत, असे या संस्थेने नमूद केले आहे.

पाकिस्तान उघडपणे नवे अणुबॉंब तयार करण्याच्या प्रयत्नांत असताना बुश सरकार स्वस्थ बसले असल्याची टीका मॅसेच्युसेट्‌सचे डेमोक्रॅट नेते रिप एडवर्ड मर्की यांनी केली आहे.

Tuesday, June 19, 2007

पृथ्वीशिवाय जीवसृष्टीची शक्‍यता कोठे?

पृथ्वीबाहेरील जीवसृष्टीसंबंधी संशोधकांनी अनेक शक्‍यता वर्तवल्या असल्या, तरी कोणताही ठोस पुरावा अजून त्यांच्या हाती आलेला नाही. मंगळावरील पाण्याच्या शोधामधून तेथील जीवसृष्टीची शक्‍यताही तपासून पाहिली जात आहे. टायटन आणि युरोपा या उपग्रहांचीही या संदर्भात पाहणी केली जात आहे.

भविष्यात पृथ्वीला धोका निर्माण झाल्यास पर्यायी निवासस्थान म्हणून मंगळासह सूर्यमालेतील अनुकूल ठिकाणे तपासली जात आहेत. अर्थात पृथ्वीप्रमाणे अनुकूल वातावरण कोठेच नसून, अत्यंत खर्चिक असे कृत्रिम निवासस्थान मात्र तयार केले जाऊ शकते. मंगळ हाच एक त्यातल्या त्यात अनुकूल ग्रह असल्यामुळे सर्व देशांनी त्यावर नजर रोखली आहे. मंगळाव्यतिरिक्त शनीचा उपग्रह टायटन आणि गुरूचा उपग्रह युरोपा यांवरही जीवसृष्टी असण्याची शक्‍यता वर्तवली जाते.

मंगळावर अद्याप मनुष्य पोचू शकला नाही, त्यावर वस्ती करणे सध्यातरी अत्यंत कठीण गोष्ट आहे. तेथील वातावरण, गुरुत्वाकर्षण, हवेचा दाब या गोष्टी अत्यंत भिन्न असल्यामुळे पृथ्वीवर वाढलेला मनुष्य तेथे फार काळ टिकणे अशक्‍य आहे. तरीही विकसित देश तेथे कृत्रिम वातावरण आणि बाह्य वातावरणाला योग्य अशी घरे बांधायची स्वप्ने पाहू लागले आहेत.

मंगळ, टायटन आणि युरोपाची वैशिष्ट्ये; यावरून तेथे मनुष्याने वस्ती करणे किती अवघड आहे याची कल्पना येईल.

मंगळ - पृथ्वीशी साधर्म्य असणारा सूर्यमालेतील एकमेव ग्रह.
भेट देणारे यान - स्पिरीट ऑपॉर्च्युनिटी, पाथ फाईंडर, मार्स ग्लोबल सर्व्हेयर
त्रिज्या - ३४०२ किलोमीटर (पृथ्वी : ६४०० किलोमीटर)
तापमान - उणे १४० अंश ते २० अंश सेल्सिअस
वातावरणातील वायू - कार्बन- ९५ टक्के, नायट्रोजन- २.७ टक्के, ऑरगॉन- १.६ टक्के, ऑक्‍सिजन- ०.२ टक्के.

टायटन - शनिचा उपग्रह, बुधापेक्षाही मोठा, ऍमिनो ऍसिडचे अस्तित्व, अत्यंत थंड तरीही जीवसृष्टीची शक्‍यता.
भेट देणारे यान - कासिनी- हायगेन्स प्रोब
त्रिज्या - २५७५ किलोमीटर (पृथ्वीच्या चंद्राच्या दीडपट)
तापमान - उणे १७९ अंश सेल्सिअस
वातावरणातील वायू - नायट्रोजन- ९८.४, मिथेन- १.६ टक्के.

युरोपा - गुरूचा उपग्रह, बर्फाचा पृष्ठभाग, जमिनीखाली १०० किलोमीटरपर्यंत पाण्याचा समुद्र आणि त्यात जीवसृष्टीची शक्‍यता.
प्रस्तावित यान - क्रायोबोट (खोल समुद्राचा वेध घेणार)
त्रिज्या - १५६१ किलोमीटर
तापमान - उणे २२३ अंश ते उणे १६९ अंश सेल्सिअस.
वातावरणातील वायू - अत्यंत विरळ, ऑक्‍सिजन आणि हायड्रोजन रेण्वीय स्थितीत.

जगाचा अंत २०६० मध्ये होणार; सर आयझॅक न्यूटन यांचे भाकीत

जेरुसलेम, ता. १८ जून २००७ - आधुनिक पदार्थविज्ञान आणि खगोलशास्त्राचे जनक असलेले थोर शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांनी सन २०६० मध्ये जगाचा अंत होणार असल्याचे भाकीत वर्तविले आहे. त्यांनी सन १७०४ मध्ये लिहिलेल्या एका पत्रात हे भाकीत लिहिले आहे. ...
जेरुसलेममधील हिब्रू विद्यापीठात सध्या "न्यूटन्स सिक्रेट्‌स' नावाचे एक प्रदर्शन भरले आहे, त्यात या पत्राचा समावेश आहे. शास्त्रीय हस्तलिखितांचा संग्रह असणाऱ्या एका धनाढ्य व्यक्तीने न्यूटन यांची ही हस्तलिखिते हिब्रू विद्यापीठाला प्रदान केली आहेत. विद्यापीठाने १९६९ मध्ये ही पत्रे मिळाल्यानंतर प्रथमच ती जाहीर प्रदर्शनात मांडली आहेत.

एरवी बुद्धिप्रामाण्यवादी असलेल्या या शास्त्रज्ञाने हे भाकीत बायबलमधील एका पुस्तकाच्या आधारे वर्तविले आहे. "बुक ऑफ डॅनिएल' या पुस्तकातील काही ओळींचा आधार घेऊन न्यूटन यांनी या पत्रात म्हटले आहे, की पश्‍चिम युरोपात सन ८०० मध्ये रोमन साम्राज्याची स्थापना झाली; त्यानंतर १२६० वर्षांनी जगाचा अंत होईल.

न्यूटन यांनी सतराव्या शतकात केंब्रिज विद्यापीठात केलेल्या संशोधनाद्वारे, आधुनिक विज्ञानाचा पाया घातला गेला, असे मानले जाते. अर्थात न्यूटन यांनी त्या काळातील काही अंधश्रद्धांचेही पालन केल्याचे दिसून येते. त्यांनी १६७० च्या दरम्यान धातूंचे रूपांतर सोन्यात करणाऱ्या "अल्केमी'वर संशोधन करण्यात चार वर्षे घालविली होती.

जगाचा अंत अमुक वेळी होणार, अमक्‍या काळात होणार, अशी भविष्यवाणी अनेकदा वर्तविली गेली आहे. मात्र, न्यूटन यांच्यासारख्या शास्त्रज्ञाचा संबंध या विषयाशी प्रथमच आलेला दिसत आहे. त्यामुळेच हिब्रू विद्यापीठातील त्यांचे पत्र हा अनेकांच्या उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे.

हॉकिंग यांचाही इशारा
नैसर्गिक किंवा कृत्रिम संकटामुळे पृथ्वीचा विनाश होण्याचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळेच या अफाट विश्‍वात मानवाने दुसरे एखादे वसतिस्थान शोधून काढले तरच त्याचे अस्तित्व टिकून राहील; अन्यथा पृथ्वीबरोबरच मानवजातही नष्ट होईल... प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग, १३ जून २००६, हॉंगकॉंग विद्यापीठात.